लोकमाता अहिल्याबाई होळकर

लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा खेड्यात धनगर समाजातील माणकोजी व सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला.

माणकोजी शिंदे हे सर्वसामान्य परिस्थितीतील असून देखील ते विद्वान व दूरदर्शी गृहस्थ होते.अठराव्या शतकामध्ये आजच्या सारखी शिक्षणाची साधने उपलब्ध नसताना देखील त्यांनी अहिल्येला शिक्षणाची घरीच व्यवस्था केली. अहिल्या मातेचे जीवन घडविण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा होता.अवघ्या आठ वर्षाची असतानाच होळकर घराण्याचे संस्थापक राजर्षी मल्हारराव होळकरांचा बारा वर्षाचा एकुलता एक शूरवीर मुलगा खंडेराव यांच्याशी अहिल्याचा विवाह 20 मे 1733 रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे झाला.

लग्नानंतर लगेच आपल्या चतुर ,क्षमाशील व शांत स्वभावाने त्यांनी कुटुंबातील सर्वांची मने जिंकून घेतली. त्यांना मालेराव व मुक्ताबाई अशी दोन अपत्ये झाली. दूरदृष्टी ठेवून मल्हाररावांनी देखील पुरुषप्रधान संस्कृतीच्या काळातही सुनेला तत्कालीन दरबाराची मोडी मराठी लिहिणे,वाचणे, गणित इत्यादी गोष्टी शिकवल्या.तसेच घोड्यावर बसणे,दांडपट्टा फिरवणे, युद्धाचे व राजकारणाचे डावपेच आखणे,लढाया करणे,पत्रव्यवहार करणे न्यायनिवाडा करणे इत्यादी प्रशिक्षण दिले. परिणामी अहिल्येची सामाजिक व राजकीय बुद्धी परिपक्व झाली.

 

इ.स.1754 मध्ये कुंभेरीच्या लढाईत अहिल्याचा शूरवीर पती खंडेराव यांना वीरमरण आले. वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी वैधव्य आले असताना जुन्या रूढी परंपरेनुसार सती जाण्याचे नाकारून त्यांनी पुरोगामित्वाचा परिचय दिला. सती न जाणे म्हणजे आयुष्यभर लोकनिंदा व चारित्र्यावर शिंतोडे हे माहिती असूनही सती जाणे तहकूब करण्यात अहिल्याबाईनी जे मनोधैर्य दाखवले ते अद्वितीय आहे. आपण सती गेलो तर स्वर्ग मिळेल किंवा नाही कोण जाणे. परंतु जगलो तर लाखो प्रजाजनांना सुख देता येईल असा विचार करून अहिल्याबाईने प्रजेच्या हितासाठी जगण्याचा निर्णय घेतला व धर्म ,रूढी ,परंपरा यापलीकडे कर्तव्य महत्त्वाचे माणून रयतेला कल्याणकारी राज्य दिले.

मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर 29 वर्षे अत्यंत यशस्वीपणे खऱ्या कल्याणकारी योजना काय असू शकतात आणि त्या कशा राबवल्या जाव्यात हे त्यांनी दाखवून दिले. सासरा मल्हाररावांचा मृत्यू 20 मे 1766, मुलगा मालेरावांचा मृत्यू 27 मार्च 1767 मध्ये झाला. अशी एकामागून एक दुःखे येत असतानाही अत्यंत धीराने आपली प्रजा सुखी,समाधानी आणि संपन्न बनवण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा विचार न करता अहिल्याबाईंनी धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, बंधुता ,समता व न्याय या तत्त्वाप्रमाणे राज्य केले.

पेशवा रघुनाथराव याना होळकरांच्या राज्याचा व दौलतीचा लोभ सुटला. त्याने पेशवाईत होळकरांचे राज्य विलीन करण्यासाठी पन्नास हजारांची फौज घेऊन इंदोर वर चढाई केली. हे वृत्त तेजस्विनी अहिल्याबाईला कळताच खचून न जाता त्यांनी रघुनाथरावांना खलिता पाठविला त्या म्हणतात,”आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात आमच्याकडील फितूरास गाठले. मला दुबळी समजलात की खुळी? दुःखात बुडालेेल्यास आधिक बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू? आता आपली गाठ रणांगणात पडेल! माझ्याबरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल मी हरले तर कीर्ती करून जाईल.

पण आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. म्हणून लढाईच्या भरीस न पडाल तर बरे. मी अबला आहे असे समजू नका. मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांना भारी पडेल. वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही.” मुत्सद्दी अहिल्या म्हणजे तळपती समशेर आणि लखलखती वीज होती. त्यांनी आपल्या आयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी वेचत असताना प्रदेशाची मर्यादा न घालता संपूर्ण भारतात कार्य केलेले आहे. संपूर्ण भारतात अनेक विहिरी ,तलाव ,कुंड, घाट बांधले आहेत. रस्ते,पूल निर्माण केले आहेत. जे काम भारताच्या शासन व्यवस्थेत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाते ते काम लोकमाता अहिल्याबाईंनी केलेे. उद्योगधंद्यांना व त्याच्या विकासाला प्राधान्य दिले.

मल्हाररावांच्या मृत्यूनंतर इंदोर वरून संस्थानाची राजधानी महेश्वर या ठिकाणी आणून कारागीर ,मजूर, विणकर, कलावंत ,साहित्यिक अशा गुणी लोकांच्या विकासासाठी जमीन, पैसा, घर इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या. आजही महेश्वरी साड्या, पैठणी, धोतर प्रसिद्ध आहेत. राज्यात पशुपक्षी यांना चरण्यासाठी त्यांनी कुरणे राखली.

मुंग्यांना साखर, माश्यांना कणकेचा गोळा, उन्हाळ्यात वाटसरूंना पिण्यासाठी पाणपोया, हिवाळ्यात गरजूंना गरम कपडे यांची सोय केली. आपल्या राज्यात सूक्ष्म जीवही उपाशी राहू नयेत यासाठी दक्षता घेतली. दिव्यांग, अनाथ व असहाय्य लोकांचे पुनर्वसन केले. गोरगरिबांसाठी अन्नछत्रे व सदावर्ते चालविली. वस्त्रांचे वाटप केले. प्रवाशांसाठी मार्गावर अरण्यमय प्रदेशातही आंबराई, बगीचे ,वृक्षारोपण विश्रांतीसाठी ओटे व धर्मशाळा बांधल्या. घाट बांधतांना केवळ तज्ञांची मत विचारात न घेता प्रत्यक्ष त्या भागातील स्त्रियांना बोलून घाटाच्या पायऱ्या कशा हव्यात , कपडे धुताना बाळ कुठे ठेवायला सोयीस्कर पडेल, कपडे बदलताना खोल्या कुठे असाव्यात? इतक्या बारीक तपशिलासह घाट बांधून घेतले.

सर्वधर्मसमभावाचा आदर्श मिरवीत मंदिरे ,मशिदी, दर्गे व विहार बांधली. तर काही मंदीरांचा जीर्णोद्धार केला. रस्ते व महारस्ते बांधल्यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळाले.मजुरांना काम मिळाले व सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एकात्मता निर्माण झाली. राज्यातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंत फणसे या बहादुरा सोबत स्वतःच्या एकुलत्या एक मुलीचा आंतरजातीय विवाह लावून जातीभेदाला तडा दिला. अहिल्याबाई ह्या समाजसुधारक होत्या.त्यांनी धर्मातील रूढी आणि परंपरांचा आंधळेपणाने कधीही स्वीकार केला नाही. त्यांनी एकच धर्म पाळला आणि तो म्हणजे मानवताधर्म. प्रजेवर जास्त करांचा बोजा न लादता राज्याचा कोष समृद्ध केला. स्वतःचा खर्च मर्यादित करून खाजगी उत्पादनाचा उपयोग सुद्धा लोककल्याणासाठी केला. अशी एक ना अनेक विधायक कामे संपूर्ण भारतात केल्यामुळे त्या खऱ्या अर्थाने लोकमाता व राष्ट्रमाता झाल्या.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर 

सावरकर, विनायक दामोदर : (२८ मे १८८३ – २६ फेब्रुवारी १९६६). भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक. ‘स्वातंत्र्यवीर’ म्हणून विख्यात. जन्म नासिकपासून काही अंतरावर असलेल्या भगूर ह्या गावी.

थोरले गणेश आणि सर्वांत धाकटे डॉ.नारायण हे त्यांचे दोन भाऊ. सावरकरांचे शिक्षण भगूर, नासिक, पुणे आणि मुंबई येथे एल्एल्.बी.पर्यंत झाले. पुढे ‘बॅरिस्टर’ ही पदवी त्यांनी लंडनला जाऊन घेतली. विद्यार्थिजीवनाच्या आरंभापासूनच सावरकरांचा वाचनाकडे ओढा होता. त्यात विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला, रामायण-महाभारत, विविध बखरी आणि इतिहासग्रंथ, तसेच मोरोपंत, वामनादिकांचे काव्यग्रंथ इ. साहित्याचा समावेश होता. संस्कृत साहित्याचाही त्यांचा अभ्यास चांगला होता. विविध वृत्तपत्रांच्या वाचनातून देश-विदेशांतील परिस्थितीचे तल्लख भानही त्यांना येत गेले होते. सावरकर हे वृत्तीने कवी होते आणि लहान वयापासून त्यांनी उत्तम वक्तृत्वही अभ्यासपूर्वक कमावले होते.

१८९७ साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीत इंग्रज सैनिकांनी घरोघरी जाऊन तपासण्या करताना नागरिकांवर जे अत्याचार केले, त्याचा सूड घेण्यासाठी चाफेकर बंधूंनी ह्या तपासण्यांवर देखरेख करणारा पुण्याचा कमिशनर रँड ह्याचा खून केला आणि ह्या संदर्भात सरकारला माहिती देणाऱ्या गणेश आणि रामचंद्र द्रविड ह्यांनाही ठार मारले. चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आले. त्यांच्या बलिदानाचा सावरकरांच्या मनावर खोल ठसा उमटला आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्घ करण्याची शपथ घेतली. १८९९ मध्ये सशस्त्र क्रांतीच्या कार्यासाठी त्यांनी ‘राष्ट्रभक्त समूह’ हे गुप्तमंडळ स्थापन केले तथापि प्रकट चळवळीसाठी एखादी संस्था असावी, ह्या हेतूने त्यांनी जानेवारी १९०० मध्ये ‘मित्रमेळ्या’ची स्थापना केली. त्यांच्या भोवती अनेक निष्ठावंत तरुण जमले. त्यांत कवी ⇨ गोविंद ह्यांचा समावेश होता. शिवजयंत्युत्सव, गणेशोत्सव, मेळे ह्यांच्या माध्यमातून लोकजागृती घडवून आणणाऱ्या मित्रमेळ्याच्या कार्यक्रमाला कवी गोविंदांच्या काव्यरचनांनी प्रभावी साथ दिली. सावरकरांनी ठिकठिकाणी मित्रमेळ्याच्या शाखा उभारून स्वातंत्र्यासाठी सशस्त्र उठाव करण्याची तयारी असलेल्या तरुणांचे व्यापक जाळे निर्माण केले. पुढे १९०४ मध्ये ह्या मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ ह्या संस्थेत झाले. क्रांतिकारक म्हणून ⇨ जोसेफ मॅझिनी ह्या इटालियन देशभक्ताचा आदर्श त्यांच्यासमोर होता. त्याचप्रमाणे आयर्लंड आणि रशियातील क्रांतिकारकांचेही सावरकरांना आकर्षण होते. गनिमी काव्याचे धोरण सैन्यांत व पोलिसांत गुप्त क्रांतिकारकांची भरती करणे रशियासारख्या परराष्ट्रांशी गुप्त संधान बांधणे इंग्रजी सत्तेच्या केंद्रांवर आणि प्रतिनिधींवर हल्ले करणे शस्त्रास्त्रे साठवणे इ. मार्ग अवलंबून इंग्रजांना राज्य करणे नकोसे करून सोडावे, असे मार्ग सावरकरांना उचित वाटत होते.

‘मित्रमेळ्याचे ’ काम करीत असताना सावरकरांचे लेख, कविता इ. साहित्य ठिकठिकाणी प्रसिद्घ होत होते आणि प्रभावीही ठरत होते. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी विदेशी कपड्यांची होळी करण्याचा एक कार्यक्रम पार पाडला होता. परिणामतः त्यांना दंड भरावा लागला आणि महाविद्यालयाच्या वसतिगृहातून काढून टाकण्यात आले.

एल्एल्.बी. झाल्यानंतर लंडनमध्ये बॅरिस्टरीचे शिक्षण घेण्यासाठी ९ जून १९०६ ह्या दिवशी सावरकरांनी भारताचा किनारा सोडला. लंडनमध्ये असलेले क्रांतिकारक ⇨ श्यामजी कृष्ण वर्मा  ह्यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे हे त्यांना शक्य झाले. लंडनमध्ये असताना सावरकरांनी जी कामे केली, त्यांचे तीन भाग सांगता येतील : (१)साहित्यनिर्मिती (२) प्रकट चळवळी आणि समारंभ, (३) गुप्त क्रांतिकार्य.

लंडनमध्ये असताना विहारी   आणि काळ  ह्या मराठी नियतकालिकांसाठी सावरकरांनी वार्तापत्रे पाठविली. त्याचप्रमाणे जोसेफ मॅझिनी यांचे आत्मचरित्र व राजकारण (१९०७) हा ग्रंथ अनुवादित केला. १८५७ चे भारतीय स्वातंत्र्यसमर  ह्या ग्रंथाचे हस्तलिखितही पूर्ण केले (सु. १९०८).

ह्या हस्तलिखितावर पोलिसांची नजर होती. त्यामुळे ते सहजासहजी प्रसिद्घ होईना. तो ग्रंथ इंग्रजीत अनुवादून परदेशात प्रसिद्घ करणेही अवघड गेले. अखेरीस हॉलंडमध्ये त्याच्या अनुवादाच्या छपाईची व्यवस्था झाली. ह्या ग्रंथाच्या मराठी हस्तलिखिताचा पहिला मसुदा लंडनमध्ये ‘अभिनव भारत’चे सभासद झालेल्या डॉ. कुटिन्हो ह्यांच्याकडे होता. तो १९४९ मध्ये सावरकरांना परत मिळाला. ह्या ग्रंथाची  आवृत्ती २००८ मध्ये निघाली आणि तिच्या एक लाखांहून अधिक प्रती ती प्रसिद्घ होताच खपल्या.

१८५७ च्या उठावाचा व्याप फार मोठा होता आणि ब्रिटिश साम्राज्याला जबरदस्त धक्का देणारा तो पूर्वनियोजित संग्राम होता अशी सावरकरांची धारणा होती. तसेच उठाव कसा केला पाहिजे, ह्याचा एक वस्तुपाठच ह्या उठावाने निर्माण केला, असेही त्यांचे मत होते. लंडनमधील वास्तव्यकालात सावरकरांनी शिखांचा इतिहासही लिहिला पण तो प्रसिद्घ होऊ शकला नाही. त्याचे मूळ हस्तलिखितही गहाळ झाले. मात्र शीख पलटणीत उठावाची प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक पत्रके लिहून ती गुप्तपणे तिकडे पोहोचतील अशी व्यवस्था केली. स्वातंत्र्याकांक्षी आयरिश लोक न्यूयॉर्क येथून चालवीत असलेल्या गेलिक अमेरिकन  ह्या वृत्तपत्रात त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लेखही लिहिले. लंडनमधील आपल्या प्रकट स्वरूपाच्या कार्यासाठी ‘फ्री इंडिया -सोसायटी’ ची स्थापना करून त्या संस्थेतर्फे शिवोत्सव, १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा महासोहळा, श्रीगुरूगोविंदसिंग ह्यांचा जन्मदिवस, विजयादशमीचा उत्सव असे विविध उत्सव सावरकरांनी घडवून आणले.

लंडनला सावरकरांच्याबरोबर असलेले ⇨ सेनापती बापट ह्यांनी बाँब तयार करण्याची विद्या काही रशियन क्रांतिकारकांच्या साहाय्याने माहीत करून घेतली होती. ही माहिती भारतात क्रांतिकारकांच्या विविध केंद्रांवर पाठविण्यात आली होती. पुढे वसई येथे बाँबचा कारखाना काढण्यात आला. सावरकरांनी काही पिस्तुले मिळवून तीही भारतात पाठविली होती. त्यातली काही सर सिकंदर हयात खान ह्यांनी आणली होती. ब्रिटनविरुद्घ जागतिक पातळीवर मोठे षड्‌यंत्र उभारण्याचाही सावरकरांचा प्रयत्न होता.

ब्रिटिशांच्या दडपशाहीचा एक भाग म्हणून ⇨ बाबाराव सावरकर ह्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. त्यांची सारी मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनीच ‘अभिनव भारत’ चे एक सदस्य ⇨ मदनलाल धिंग्रा ह्यांनी भारतमंत्र्याचे स्वीय सहायक कर्झन वायली ह्यांचा लंडनमध्ये गोळ्या झाडून खून केला (१ जुलै १९०९). ह्याच्या निषेधार्थ ५ जुलै रोजी लंडनच्या ‘कॅक्‌स्टन हॉल’ मध्ये भरलेल्या सभेत सावरकरांनी निषेधाच्या ठरावाला विरोध केला. ठरावावरच्या भाषणात न्यायालयीन निर्णय होण्यापूर्वीच धिंग्रांना गुन्हेगार ठरविणे हे न्यायालयाच्या अधिकारांवर अतिक्रमण होते, असा युक्तिवाद सावरकरांनी वृत्तपत्रांना पत्र पाठवून केला. सावरकरांच्या हालचालींमुळे त्यांना बॅरिस्टरीची सनद मिळण्यातही अडचणी उत्पन्न झाल्या होत्या. अहमदाबाद येथे व्हॉइसरॉयवर बाँब टाकण्याच्या प्रकरणात त्यांचे धाकटे बंधू नारायणराव सावरकर ह्यांनाही अटक झाली होती. ह्या सर्व घटनांचा ताण सावरकरांच्या मनावर पडला. या सुमारास त्यांना न्यूमोनियाही झाला. त्यातून उठल्यावर ते पॅरिसला गेले. तेथे ते ⇨ भिकाजी रुस्तुम कामा ह्यांच्याकडे राहिले. दरम्यानच्या काळात नासिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन ह्याचा खून झाला. ह्या वधासाठी वापरलेली पिस्तुले सावरकरांनी भारतात पाठविलेल्या पिस्तुलांपैकी असल्यामुळे हे सर्व प्रकरण सावरकरांपर्यंत पोहोचले. त्यानंतर तेथे सावरकरांच्या आप्तांचा आणि सहकाऱ्यांचा पोलिसी छळ सुरू झाला. ह्या परिस्थितीत पॅरिसला राहून अटक टाळण्यापेक्षा लंडनला जाऊन अटक होण्याचा धोका आपण पत्करावा असे त्यांनी ठरविले. १३ मार्च १९१० रोजी त्यांना अटक झाली. पुढे चौकशीसाठी त्यांना भारतात नेले जात असताना मार्से बंदरात त्यांनी प्रातर्विधीला जाण्याच्या निमित्ताने शौचकुपात जाऊन तिथल्या ‘पोर्ट होल’ मधून समुद्रात उडी घेतली आणि ते मार्सेच्या धक्क्यावर फ्रेंच हद्दीत आले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तिथे येऊन त्यांना अटक केली. अशी अटक कायदेशीर नाही, ह्या मुद्यावर सावरकरांतर्फे द हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात मागितलेली दादही व्यर्थ ठरली.

सावरकरांना हिंदुस्थानात आणून त्यांच्यावर दोन खटले चालविण्यात आले. जॅक्सनच्या वधाला साहाय्य केल्याचा तसेच अन्य काही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. आपण फ्रान्सच्या भूमीवर असताना बेकायदेशीरपणे आपल्याला अटक केल्यामुळे तसेच हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल तेव्हा आलेला नसल्यामुळे आपण ह्या खटल्यांच्या कामात भाग घेणार नाही, अशी सावरकरांची भूमिका होती. ह्या दोन्ही खटल्यांचा निकाल लागून सावरकरांना पन्नास वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा झाली त्यांची सगळी मिळकतही जप्त करण्यात आली (२४ डिसेंबर १९१० आणि ३० जानेवारी १९११).

सावरकरांना अंदमानात ४ जुलै १९११ रोजी आणण्यात आले. छिलका कुटणे, काथ्या वळणे, कोलू फिरवणे अशी अतिशय कष्टाची कामे त्यांना तुरुंगात करावी लागली.तिथल्या हालअपेष्टांमुळे त्यांचे शरीर खंगत गेले, पण अशाही परिस्थितीत त्यांनी कमला हे दीर्घकाव्य रचावयास घेतले. अंदमानातल्या राजबंद्यांना संघटित करून त्यांनी त्यांच्या काही मागण्यांची तड लावली. ग्रंथाभ्यासाची संधी उपलब्ध होताच त्यांनी अफाट वाचन केले. त्यात भारतीय तत्त्वज्ञान, प्लेटो, ॲरिस्टॉटल, मिल, स्पेन्सर आदींचे ग्रंथ तसेच ज्ञानेश्वरी, कुराण, बायबल ह्यांच्या वाचनाचा समावेश होतो. बंदिवानांमध्येही त्यांनी अभ्यासाची आवड उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला.

सावरकर हिंदीचे अभिमानी होते. हिंदी भाषेच्या प्रचाराचेही त्यांनी अंदमानात काम केले. हिंदी ही राष्ट्रभाषा झाली पाहिजे, ह्या मताचे ते होते. मात्र इतर प्रांतांच्या भाषाही शिकल्या पाहिजेत, असे ते सहबंदिवानांना सांगत असत. तसेच त्यांना साक्षर बनविण्याचे कार्यही त्यांनी तेथे केले.

१९२१ मध्ये सावरकरांना अंदमानामधून हिंदुस्थानात आणण्यात आले आणि रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तिथे त्यांनी हिंदुत्व (मूळ ग्रंथ इंग्रजी मराठी अनुवाद, १९२५) आणि माझी जन्मठेप (१९२७) हे ग्रंथ लिहिले. अंदमानात असताना सावरकरांनी एक ग्रंथालय उभे केले होते. येथेही त्यांनी सरकारकडे प्रयत्न करून ग्रंथालय उभारले. सावरकरांची १९२४ मध्ये दोन अटींवर तुरुंगातून मुक्तता करण्यात आली : (१) रत्नागिरी जिल्ह्यात ते स्थानबद्घ म्हणून राहतील. (२) पाच वर्षे ते राजकारणात सहभागी होणार नाहीत. जवळपास साडेतेरा वर्षे सावरकर रत्नागिरीत होते. ह्या काळात त्यांनी अस्पृश्यतानिवारण, धर्मांतर करून गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेणे, भाषाशुद्घी आणि लिपीशुद्घी ह्या चळवळी केल्या.

अस्पृश्य व उच्चवर्णीय ह्यांच्यात सामाजिक अभिसरण घडून यावे, ह्यावर त्यांच्या अस्पृश्यनिवारण चळवळीचा विशेष भर होता. त्यासाठी स्पृश्यास्पृश्यांची सहभोजने, सर्व जातींतील महिलांचे हळदीकुंकवांचे समारंभ, शाळांमधून स्पृश्यास्पृश्य मुलांचे सहशिक्षण इ. उपक्रम त्यांनी राबविले. हे सर्व करताना त्यांना सनातन्यांच्या तीव्र विरोधाला तोंड द्यावे लागले. अस्पृश्यांना मंदिरप्रवेशबंदी असल्यामुळे त्यांनी भागोजीशेठ कीर ह्या दानशूर सद्‌गृहस्थाकडून सर्व हिंदूंसाठी प्रवेश असलेले पतित पावन मंदिर बांधविले (१९३१). रत्नागिरीतील विठ्ठलमंदिरात होणाऱ्या गणेशोत्सवात अस्पृश्यांना प्रवेश देणार नाही, अशी भूमिका सनातन्यांनी घेताच सावरकरांनी अखिल हिंदू गणपती स्थापन करून त्याचा उत्सव केला आणि गणेशमूर्तीची पूजा एका सफाई कामगाराच्या हस्ते केली. धर्मांतरितांना पुन्हा हिंदू धर्मात सन्मानपूर्वक प्रवेश देऊन त्यांनी त्यांची लग्ने हिंदू समाजात लावून देण्यासाठी पुढाकार घेतला, त्यासाठी आर्थिक साहाय्यही दिले.

सावरकरांना हिंदू समाजात प्रबोधन घडवून आणावयाचे होते दबलेल्या हिंदूंना आपल्या स्वत्वासह पुन्हा उभे करायचे होते. भाषाशुद्घी, लिपीशुद्घी ह्या त्यांच्या चळवळीही त्यासाठीच होत्या. अरबी, फार्सी आणि इंग्रजी भाषांचे आपल्या भाषांवर होणारे आक्रमण थोपवून आपल्या भाषांना त्यांचे विशुद्घ रूप प्राप्त करून दिले पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. नागरी लिपीच्या संदर्भातही त्यांनी काही सुधारणा सुचविल्या होत्या.

सावरकरांची बिनशर्त मुक्तता १० मे १९३७ रोजी करण्यात आली. त्यानंतर ते हिंदुमहासभेत गेले आणि त्या पक्षाचे नेतृत्वही त्यांच्याकडे आले. सावरकरांनी हिंदुमहासभेतर्फे निःशस्त्र प्रतिकाराचे दोन लढे दिले : एक, भागानगरचा आणि दुसरा, भागलपूरचा. भागानगरचा लढा निझामाच्या अत्याचारांविरुद्घ होता. परिणामतः निझामाच्या कायदेमंडळात जिथे हिंदूंना पूर्वी शून्य जागा होत्या, तेथे त्यांना पन्नास टक्के जागा निझामाला द्याव्या लागल्या. भागलपूरचा सत्याग्रह इंग्रजांविरुद्घ होता.

सावरकर सनदशीर मार्गांनी आपल्या चळवळी चालवीत होते, तरी सशस्त्र लढ्यावरचा त्यांचा विश्वास ढळला नव्हता, इंग्रजांविरुद्घ अखेरची लढाई सशस्त्र लढायची वेळ आली, तर आपल्या भारतीय तरुणांना सैनिकी शिक्षण असणे आवश्यक आहे, ही त्यांची स्पष्ट धारणा होती. त्यामुळे दुसरे महायुद्घ सुरू होताच, त्यांनी अशी निःसंदिग्ध भूमिका घेतली, की आपल्या समाजाच्या सैनिकीकरणास आणि औद्योगिकीकरणास साहाय्यभूत होणाऱ्या सर्व युद्घकार्यात आपण पूर्णपणे सहभागी झाले पाहिजे. सैन्यात आपल्या तरुणांना भूदल, नौदल, वायूदल ह्यांत दाखल होता येईल. शस्त्रास्त्रे बनविण्याचे आणि चालविण्याचे तंत्र त्यांना आत्मसात करता येईल. भारताचे सैनिकीकरण आणि औद्योगिकीकरण ह्यांचे महत्त्व त्यांना अपरंपार वाटत होते.

‘अखंड, एकात्म हिंदुस्थान’ ही सावरकरांची ठाम भूमिका होती. ती त्यांनी ‘क्रिप्स कमिशन’पुढेही मांडली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला, ह्याचा त्यांना आनंद झाला तथापि देशाची फाळणी झाली, देशाचे तुकडे झाले, ह्याचे त्यांना परमदुःख झाले. फाळणीनंतर हिंदूंवर झालेले अत्याचार, रक्तपात ह्यांनीही ते व्यथित आणि संतप्त झाले होते, ह्या भावना त्यांनी उघडपणे व्यक्त केल्या.

दिल्लीत महात्मा गांधींची हत्या झाली (१९४८). तीत सावरकरांचा सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली तथापि त्या खटल्यात सावरकरांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

घटना समितीकडे १९४९ मध्ये त्यांनी तीन सूचना केल्या : देशाचे नाव भारत ठेवावे, हिंदी ही राष्ट्रभाषा करावी आणि नागरीलिपी ही राष्ट्रलिपी करावी तसे घडले.

भारतात सशस्त्र क्रांती करून स्वातंत्र्याची प्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘अभिनव भारत’ ह्या संघटनेचा सांगता समारंभ १९५२ च्या मे महिन्यात पुण्यात साजरा करण्यात आला.

त्यांची प्रकृती १९६६ मध्ये ढासळली आणि त्यांनी प्रायोपवेशन करून जीवनाचा अंत करण्याचे ठरविले. मुंबई येथे त्यांचे देहावसान झाले. सावरकर हे हिंदुराष्ट्रवादी होते. आरंभी नव्हते तथापि अनुभवांच्या ओघात भारतीय वास्तवाचे त्यांना जे आकलन झाले, त्यानुसार ते हिंदुराष्ट्रवादाच्या भूमिकेवर आले. हिंदुत्व ह्या आपल्या ग्रंथात त्यांनी हिंदुत्वाच्या मूलभूत तत्त्वांचे विवेचन केले आहे.

सावरकर हे वृत्तीने कवी होते. ‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता त्यांना एका तीव्र भावावेगाच्या प्रसंगी सुचली. रानफुले (१९३४) ह्या त्यांच्या काव्यसंग्रहात त्यांचे कमला हे खंडकाव्य, काही स्फुट काव्ये आणि वैनायक वृत्ताचा विशेष सांगणारा एक निबंध अंतर्भूत आहे. त्यांची संपूर्ण कविता सु. १३,५०० ओळींची भरेल. सावरकरांची कविता (१९४३) ह्या नावाने त्यांची कविता संकलित करण्यात आली आहे. माझी जन्मठेप ह्या त्यांच्या ग्रंथात अंदमानातील तुरुंगवासाचा आत्मचरित्रपर इतिहास आहे. माझ्या आठवणी (जन्मापासून नाशिकपर्यंत, १९४९), भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने (२ खंड, १९६३) आणि शत्रूच्या शिबिरात (१९६५) हे त्यांचे अन्य काही उल्लेखनीय ग्रंथ होत. भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने ह्या ग्रंथात बौद्घकाळाच्या आरंभापासून इंग्रजी राजवटीच्या अखेरीपर्यंत ज्या स्त्री-पुरुषांनी राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी पराक्रम केला, त्यांचा इतिहास आहे. शत्रूच्या शिबिरात हे त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकांपैकी एक. मला काय त्याचे ? अथवा मलबारांतील मोपल्यांचे बंड (आवृ. दुसरी, १९२७) आणि काळे पाणी (१९३७) ह्या त्यांच्या दोन कादंबऱ्या. उःशाप (१९२७), संन्यस्त खड्‌ग (१९३१) आणि उत्तरक्रिया (१९३३) ही त्यांनी लिहिलेली नाटके. सावरकरांचे जात्युच्छेदक निबंध (१९५०) त्यांची जातिभेदनिर्मूलक भूमिका स्पष्ट करतात. त्यांच्या इंग्रजी ग्रंथांत वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स १८५७, हिंदुपदपादशाही, हिंदुराष्ट्र दर्शन, हिस्टॉरिक स्टेटमेंट्स आणि लेटर्स फ्रॉम द अंदमान (जेल) ह्यांचा समावेश होतो. हे सर्व साहित्य समग्र सावरकर वाङ्‌मय (खंड १ ते ८, १९६३–६५)ह्यात समाविष्ट आहे.

मुंबई येथे १९३८ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भाषाशुद्धी आणि लिपीशुद्घी ह्यांचे महत्त्व सांगितले. वाङ्‌मयाचे वस्तुनिष्ठ आणि रसनिष्ठ असे दोन भाग कल्पून त्या दोहोंचे त्यांनी विवरण केले. भाषणाच्याअखेरीस ‘लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या’, असा संदेश त्यांनी दिला. १९४३ मध्ये सांगली येथे भरलेल्या नाट्यशताब्दी महोत्सवाचे तेअध्यक्ष होते. त्याच वर्षी त्यांना नागपूर विद्यापीठाकडून डी.लिट्. ही सन्माननीय पदवी देण्यात आली.

संदर्भ : १. करंदीकर, शि. ल. सावरकर-चरित्र (कथन), पुणे, १९४३.

२. कीर, धनंजय अनु., खांबेटे, द. पां. स्वातंत्र्यवीर सावरकर, मुंबई, १९८३.

३. गावडे, प्र. ल. सावरकर : एक चिकित्सक अभ्यास, पुणे, १९७०.

४. जोगळेकर, ज. द. स्वातंत्र्यवीर सावरकर : वादळी जीवन, पुणे, १९८३.

५. नवलगुंदकर, शं. ना. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, पुणे, २०१०.

६. फडके, य. दि. शोध सावरकरांचा, पुणे, १९८४.

महाराष्ट्र दिन

बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…

१५० वर्षांपासून ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेला आपला भारत देश १९४७ मध्ये स्वतंत्र झाला. त्यानंतर भारतातील ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात आली. देशाला स्वातंत्र्य मिळाले; पण राज्यांची निर्मिती होणे अद्याप बाकी होते. मग भाषा आणि प्रदेशानुसार राज्यांची निर्मितीला सुरुवात झाली. 

मद्रास राज्यातील तेलुगू भाषिक भागांमध्ये एक शक्तिशाली आंदोलन झाले. त्यानंतर १९५३ मध्ये आंध्र राज्याच्या निर्मितीचा संपूर्ण देशभरात परिणाम झाला आणि राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती करण्यात आली. १९५६ मध्ये संसदेने राज्य पुनर्रचना कायदा संमत केला; ज्यामुळे भारतीय राज्यांच्या सीमा पुन्हा रेखाटण्यात आल्या.

वास्तविक ‘राज्य पुनर्रचना कायदा’ १९५६ अंतर्गत अनेक राज्ये निर्माण झाली. या कायद्याच्या आधारे कन्नड भाषा बोलणाऱ्या लोकांना म्हैसूर राज्य म्हणजेच कर्नाटक राज्य देण्यात आले. तेलुगू भाषेतील लोकांना आंध्र प्रदेश राज्य मिळाले. त्याच वेळी मल्याळम भाषेच्या लोकांना केरळ आणि तमीळ भाषेच्या लोकांना तमिळनाडू राज्य मिळाले. मराठी आणि गुजराती लोकांना स्वतःचे वेगळे राज्य मिळाले नाही. राज्य पुनर्रचना कायद्यान्वये मुंबई प्रांतासाठी नवीन सीमा तयार केल्या गेल्या होत्या. मुंबईच्या प्रांताच्या सीमा मराठवाडा, विदर्भ, सौराष्ट गुजारतपर्यंत विस्तारून नवीन राज्याची निर्मिती करण्यात आली. ज्यामुळे द्विभाषिक लोकांचा मुंबई प्रांतात समावेश झाला. त्यात मराठीसह कच्छी व कोकणी भाषा बोलणाऱ्या लोकांचा समावेश होता. १९५६ पासून संयुक्त महाराष्ट्र चळवळीद्वारे मराठी भाषकांनी स्वतंत्र राज्याच्या मागणी केली. दुसरीकडे गुजराती भाषेतील लोकांनाही स्वत:चे वेगळे राज्य हवे होते. त्यांनीही चळवळ सुरू केली. या आंदोलन व चळवळींचा परिणाम होऊन, १९६० मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्यांतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची निर्मिती झाली.

महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन वेगवेगळ्या राज्यांच्या निर्मितीनंतरही हा वाद मिटला नाही. तर, महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये मुंबई मिळविण्यासाठी वाद सुरू झाला. एकीकडे महाराष्ट्रीय लोकांना मुंबई हा त्यांच्या राज्याचा भाग म्हणून हवा होता. कारण- तेथील बहुतांश लोक मराठी बोलत होते. तर, मुंबईच्या प्रगतीमध्ये गुजराती लोकांचा जास्त वाटा आहे, असे गुजरात राज्यातील लोकांचे मत होते. त्यामुळे त्यांना मुंबईचा समावेश आपल्या राज्यात असावा, असे वाटत होते. मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करावे, असे काहींचे मत होते. परंतु, संयुक्त महाराष्ट्र चळवळीने यास प्रखर विरोध केला आणि मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली. संयुक्त महाराष्ट्र समितीमार्फत १९५६ साली मुंबईमध्ये एक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे तब्बल १०६ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला चालना मिळाली. मुंबई शहराच्या मध्यभागी असलेला हुतात्मा चौक या लढ्याचे प्रतीक आहे. या मोर्चानंतर १९५६ ते १९६० या काळात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अधिक तीव्र झाली. तत्कालीन नेत्यांनी मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती व्हावी ही मागणी लावून धरली. अखेर मुंबईचा समावेश महाराष्ट्र राज्यात करण्यात आला. मुंबई शहरात राहणारा प्रत्येक नागरिक स्वत:ला मुंबईकर म्हणवून घेतो. मुंबईत वेगवेगळ्या जाती-धर्मांचे, पंथांचे लोक राहतात; पण जेव्हा ते स्वत:ला मुंबईकर म्हणतात तेव्हा हे सर्व भेद नाहीसे होतात.

संत तुकडोजी महाराज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी ३० एप्रिल १९०९ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोपंत आणि आईचे नाव मंजुळा होते. दिनांक ११ मे १९०९ रोजी आकोटचे श्री हरीबुवा, माधानचे प्रज्ञांचक्षु श्री संत गुलाब महाराज व याव्लीचे महाराज यांनी त्यांचे नाव ‘माणिक’ असे ठेवले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार येथे झाले. श्री संत आद्कोजी महाराजांनी त्यांचे नाव ‘तुकड्या’ असे ठेवले.

 

इ.सन.१९२५ मध्ये त्यांनी ‘आनंदामृत’ ग्रंथाची रचना केली. ते स्व:त भजन,कीर्तन, प्रवचन करू लागले. पुढे त्यांचा गांधीजींशी सहवास आला. २८ ऑगष्ट १९४२ रोजी स्वातंत्र्य संग्राम चळवळीत भाग घेतल्याने त्यांना अटक झाली आणि डिसेंबर १९४२ मध्ये त्यांची सुटका झाली.

ते म्हणत गावा गावासी जागवा । भेदभाव समूळ मितवा” उजळा ग्रामोन्नतिचा दिवा । तुकड्या म्हणे ।”

संत रामदासांनी ‘दासबोधा’तील एका समासात ‘कसं लिहावं?’ हे सांगितलं आहे तर संत तुकडोजी महाराजांनी ‘काय वाचावं?’ नि ‘कशासाठी वाचाव?’ हे त्यांच्या ‘ग्रामगीते’च्या चाळिसाव्या अध्यायात सांगितलं आहे. या अध्यायाचं नाव आहे ‘ग्रंथाध्ययन.

भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या.

खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले. सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.

ते आपल्या भजनातून जाती भेद पाळू नका, अस्पृश्यता गाडून टाका, दारू पिवू नका, देशावर प्रेम करा असा उपदेश करीत.

भाविक जनांसि लावावया वळण।
आकळावया सकळ ज्ञान।
संत-महंत उपकार ऋण।

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र देणारे तसेच असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल १८९१ रोजी जन्म झाला.


मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. मध्य प्रदेशानंतर काही काळ दापोली, सातारा असे वास्तव्य करीत आंबेडकरांचे कुटुंब मुंबईत राहण्यास आले. बाबासाहेबांनी सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील सरकारी शाळेत घेतले. वयाच्या १४-१५ वर्षी बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह दापोली येथील भिकू वलंगकर यांच्या मुलीशी म्हणजेच रमाबाई यांच्याशी झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1907 मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात बी.ए. पदवी घेतली. यानंतर त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्कमध्ये मास्टर्स ऑफ आर्ट्ससाठी प्रवेश घेतला आणि 1927 मध्ये अर्थशास्त्रात पीएचडी केली. 1916 मध्ये त्यांनी ग्रेज इन येथे बार कोर्ससाठी प्रवेश घेतला. यासोबतच त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात आणखी एक डॉक्टरेट पदवी पूर्ण केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 64 विषयात मास्टर्स होते आणि त्यांना 11 भाषां लिहिता वाचता आणि बोलता येत होत्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली सार्वजनिक जयंती सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली. त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा सुरू केली आणि भीम जयंतीचे औचित्य साधत बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून रथातून, उंटावरून अनेक मिरवणुका काढल्या होत्या. तेव्हापासून दरवर्षी 14 एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच भीमराव आंबेडकर यांचे जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते केवळ मागासवर्गीयांच्या हक्कांसाठीच लढले नाहीत तर पक्षपात आणि जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारे समाजसुधारकही होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे नेतृत्व केले होते. जवाहरलाल नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांनी कायदा आणि न्यायमंत्री म्हणून काम केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेत दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. डॉ. भीमराव आंबेडकर यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. 1990 मध्ये बाबासाहेबांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महात्मा जोतिराव गोविंदराव फुले

महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. हे एक भारतीय समाजसुधारक, समाजप्रबोधक, विचारवंत, समाजसेवक, लेखक, तत्त्वज्ञ आणि क्रांतिकारी कार्यकर्ते होते. त्यांना महात्मा फुले आणि “जोतिबा फुले” म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या.

गरीब आणि दुर्बलांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्योतिबांनी 1873 मध्ये ‘सत्यशोधक समाज’ ची स्थापना केली. त्यांची समाजसेवा पाहून 1888 मध्ये मुंबईत एका विशाल सभेत त्यांना ‘महात्मा’ ही पदवी देण्यात आली. त्यांनी स्त्रियांच्या आणि मागासलेल्या आणि अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी अनेक कामे केली. समाजातील सर्व घटकांना शिक्षण देण्याचे ते खंबीर पुरस्कर्ते होते. ते भारतीय समाजात जात-आधारित विभाजन आणि भेदभावाच्या विरोधात होते.

स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणे, बालविवाहाला विरोध करणे, विधवा विवाहाला पाठिंबा देणे हे त्यांचे मूळ उद्दिष्ट होते. फुले यांना समाजाला कुप्रथा, अंधश्रद्धेच्या पाशातून मुक्त करायचे होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षण देण्यात, महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यात घालवले.

ज्योतिबांनी ब्राह्मण-पुरोहिताविना विवाह विधी सुरू केला आणि त्याला मुंबई उच्च न्यायालयानेही मान्यता दिली. ते बालविवाहाच्या विरोधात होते आणि विधवा पुनर्विवाहाचे समर्थक होते. आपल्या हयातीत त्यांनी गुलामगिरी, तृतीय रत्न, छत्रपती शिवाजी, राजा भोसला का पखडा, किसान का कोडा, अस्पृश्य की कैफियत अशी अनेक पुस्तकेही लिहिली. महात्मा ज्योतिबा आणि त्यांच्या संघटनेच्या संघर्षामुळे सरकारने ‘कृषी कायदा’ मंजूर केला. धर्म, समाज आणि परंपरा यांचे सत्य समोर आणण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली.

कार्यक्षेत्र
त्यांनी विधवा आणि महिलांच्या कल्याणासाठी खूप काम केले, त्यासोबतच त्यांनी शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठीही खूप प्रयत्न केले. ज्योतिबांना संतांची चरित्रे वाचण्याची खूप आवड होती. जेव्हा देवासमोर सर्व स्त्री-पुरुष समान असतात, तेव्हा उच्च-नीच असा भेद का असावा, हे त्यांना कळून चुकले होते. स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी फुले यांनी 1848 मध्ये शाळा उघडली. या कामासाठी देशातील पहिली शाळा होती. मुलींना शिकवण्यासाठी त्यांना शिक्षक मिळाला नाही, म्हणून त्यांनी स्वतः काही दिवस हे काम करून पत्नी सावित्री फुले यांना पात्र बनवले. काही लोकांनी सुरुवातीपासूनच त्यांच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, पण फुले पुढे सरकत असताना त्यांनी वडिलांवर दबाव आणून पती-पत्नीला घराबाहेर काढले, यामुळे त्यांचे काम काही काळ थांबले, पण लवकरच त्यांनी मुलींसाठी एकामागून एक तीन शाळा उघडल्या.

1883 मध्ये, स्त्रियांना शिक्षण देण्याच्या महान कार्यासाठी, त्यांना तत्कालीन ब्रिटिश भारतीय सरकारने “स्त्री शिक्षणाचे जनक” म्हणून गौरवले. 28 नोव्हेंबर 1890 रोजी वयाच्या 63 व्या वर्षी पुणे येथे त्यांचे निधन झाले.

चित्रकला स्पर्धा २०२४

महाराष्ट्र मंडळ कुवेत आयोजित ७५ व्या अमृत मोहत्सवी ऑनलाइन चित्रकला स्पर्धेला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे स्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.
सर्व सहभागींनी वेळ आणि मेहनत घेऊन तयार केलेली अप्रतिम कलाकृती खालील प्रमाणे.

मराठी भाषा गौरव दिन

मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला.


मराठी भाषागौरव दिवस आणि मराठी राजभाषा दिवस हे दोन्ही दिवस भिन्न आहेत.

भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 347 नुसार लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राष्ट्रपतींना राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून घोषित करण्यात आले आहे.

1 मे रोजी महाराष्ट्र दिनाबरोबरच मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो.1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.परंतु राज्य कारभाराची अधिकृत भाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता नव्हती. हे शल्य वसंंतराव नाईक यांना होते. त्यामुळे तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक सरकारने ‘मराठी राजभाषा अधिनियम 1964’ सर्वप्रथम आणून 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध केला. या अधिनियमानुसार, महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे वसंंतराव नाईक सरकारने १ मे रोजी अधिकृतपणे जाहीर केले.1966 पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. वसंतराव नाईक सरकारने पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यात पहिल्यांदाच भाषा संचालनालयाची निर्मिती करून प्रादेशिक स्तरावर चार केंद्राची स्थापना केली आणि राज्यकारभार मराठीतून चालणार असे अधिकृत जाहीर केले.
मराठी भाषा ज्ञानभाषा करण्यासाठी परिश्रम घेणारे प्रतिभावंत साहित्यिक वि.वा.शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषागौरव दिवस म्हणून सन २०१३ पासून साजरा केला जातो.

संत गाडगेबाबा

संत गाडगेबाबा – कार्य

१९०८ : मध्ये पुर्णा नदीवर घाटाचे निर्माण केले.

१९२५ : मुर्तीजापूर येथे गोरक्षण , धर्मशाळा व विद्यालयाचे निर्माण केले.

१९१७ : पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळेचे निर्माण गाडगेमहाराजांनी केले. मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही“ असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.

फेब्रुवारी ८,इ.स. १९५२ रोजी ‘श्री गाडगेबाबा मिशन‘ स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या. गाडगे महाराज जातीने परिट व गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.

१९३२ : ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले. गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला. “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला“ हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते. आचार्य अत्रे गाडगेबाबां बद्दल म्हणतात ‘सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात‘

१९३१ : वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.

१९५४ : जे.जे. हॉस्पिटल धर्मशाळा ( मुंबई) बांधली. गाडगे बाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती. डॉ आंबेडकर सुद्धा त्यांना गुरू स्थानी मानत असत.

गाडगे महाराज, ज्यांना संत गाडगे महाराज किंवा गाडगे बाबा म्हटले जाते. त्याना महाराष्ट्रातील एक महान कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक म्हणून ओळखले जाते. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. अशा या महान पुरुषाने राबविलेल्या मोहिमेची दखल आपल्या राज्य-शासनाला घ्यावी लागली. त्यांच्या नावाने ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान’ राज्यस्तरीय मोहीम कार्यरत आहे. त्यांच्या सन्मानार्थ अमरावती विद्यापीठा ला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नाव देण्यात आले.

गाडगे महाराज चरित्र

त्यांचे खरे नाव देविदास डेबूजी जानोरकर. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील शेडगाव गावात धोबी कुटुंबात झाला. ते मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरी येथे आपल्या आजोबांच्या घरी लहानाचा मोठा झाले. लहानपणापासूनच त्यांना शेती आणि पशुपालनाची आवड होती. १८९२ मध्ये त्यांनी लग्न केले आणि त्यांना तीन मुले झाली. १ फेब्रुवारी १९०५ रोजी संत म्हणून आपले जीवन जगण्यासाठी आपले कुटुंब सोडण्यापूर्वी त्यांनी आपल्या गावात स्वयंसेवक म्हणून काम केले. गाडगे महाराजांनी बारा वर्षे अज्ञातवासात घालवली. या काळात गाडगे महाराजांनी कडन्ना प्राशन करून, चिंध्या पांघरून, मस्तकी गाडगे घालून शारीरिक श्रम केले. लोक त्यांना आदराने गाडगे महाराज म्हणू लागले.

लोकांचे जीवन उजळण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी फिरले, गावातील रस्ते हाताने साफ केले. विवेकाच्या बळावर गावोगावी जाऊन त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली. गाडगे महाराज यांनी गरीब आणि दीनदुबळ्यांमधील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता नष्ट करण्यासाठी तळमळीने काम केले. गरीब, दुर्बल, अनाथ, अपंग यांची सेवा करून त्यांनी लोकांना अज्ञान, दुर्गुण, दोष यांची जाणीव करून दिली. त्यांची प्रवचनेही साधी आणि सोपी असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज घेऊ नका, व्यसने करू नका, देव-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद, अस्पृश्यता पाळू नका, असे ते नेहमी म्हणायचे. देव दगडात नसून माणसांमध्ये आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. गाडगे महाराज संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानत. आपले विचार साध्या लोकांना कळावेत म्हणून त्यांनी ग्रामीण भाषेचा, प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा वापर केला.

जेव्हा ते गावात पोहोचायचे तेव्हा ते गावातील नाले आणि रस्ते स्वच्छ करायचे आणि गावकऱ्यांनी पैसे दिले तर ते समाजासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी वापरायचे. गाडगे महाराजांनी मिळालेल्या पैशातून अनेक शैक्षणिक संस्था, धर्मशाळा, रुग्णालये, प्राणी निवारे सुरू केले आहेत. त्यांनी कीर्तनाच्या स्वरूपात वर्गही चालवले, बहुतेक कबीरांच्या दोहेतून समाजाला नैतिकतेचे धडे दिले. त्यांनी कठोर परिश्रम, साधे जीवन आणि गरिबांची निस्वार्थ सेवा करण्याचा उपदेश केला. त्यांनी धार्मिक स्थळे आणि अनाथ आणि अपंगांसाठी धार्मिक शाळाही स्थापन केल्या. गाडगे महाराजांनी पंढरपूर, देहू, आळंदी, नाशिक, मुंबई येथे अनेक धर्मशाळा बांधल्या. अनेक लोककल्याणाची कामे केली. त्यांनी आपले जीवन एकनिष्ठ आणि धार्मिक वृत्तीने व्यतीत केले. गाडगे महाराज हे समतेचे पुरस्कर्ते होते. अखेर त्यांच्या पार्थिवावर अमरावती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी महाराजाधिराज, रयतेचे राजे, श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना ३९४ व्या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा.

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधी श्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !

शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप
शिवरायांचा आठवावा साक्षेप
भूमंडळी ।।१।।

शिवरायांचे कैसें बोलणें।
शिवरायांचे कैसें चालणें।
शिवरायांची सलगी देणे।
कैसी असे ।।२।।

या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षि ऐसा नाही l महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे ||

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा शिवाजी महाराजांनी रचला. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर व रयतेवर जीवापाड प्रेम केले. जाती-पातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला. त्यामुळेच त्यांना रयतेचा राजा म्हटले जाते. प्रत्येक मोहिमेनंतर शिवाजी महाराज तलवारी मिरवणाऱ्या धारकऱ्यांना ‘मानकरी’, भाला फेकणाऱ्या निष्णात सैनिकाचा ‘भालेराव’ अशी उपाधी देऊन गौरव करायचे. जीवावर उदार होवून चढाई करणाऱ्या सैनिकांना सोन्याचे कडे द्यायचे.

शिवाजी महाराजांना मोठी दूरदृष्टी होती. स्वराज्यासाठी काय काय केले जाऊ शकते, याचा विचार त्यांच्याकडे होता. स्वराज्य स्थापनेनंतर ते विस्तारले कसे जाईल, याचा ते सदैव विचार करत असत. त्यांनी बांधलेले गडकिल्ले हे याचे उत्तम उदाहरण आहे. हे गडकिल्ले इतके अभेद्य असत की शत्रूला त्यावर चाल करून जाताना हजारदा विचार करावा लागे. किल्ल्यांभोवतीची तटबंदी मजबूत असे आणि त्यासाठी किल्ल्यावर केलेल्या खोदकामांतून मिळालेलेच दगड वापरले जाते. त्यामुळे इतक्या उंचावर इतके अभेद्य किल्ले बांधता आले. शत्रूचा धोका जसा जमिनीवर आहे तसाच तो पाण्याच्या बाजूनेही असू शकतो, या दूरदृष्टीतून त्यांनी जलदुर्गांची निर्मिती केली. हा संपन्न वारसा आजही महाराष्ट्र अभिमानाने मिरवत आहे.

गनिमी कावा हे शिवाजी महाराजांचे प्रमुख हत्यार होते. अनेक मोहिमा, लढाया शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करून जिंकल्या होत्या. शत्रूचे सैन्य कितीही प्रचंड असले तरी काही मावळ्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी शत्रूचा पाडाव केला. स्वराज्य स्थापन करताना शिवाजी महाराजांनी शेकडो किल्ले बांधले आणि जिंकले. हिंदवी स्वराज्यात शिवाजी महाराजांकडे 400 गड-किल्ले होते, असे सांगितले जाते. यातील अनेक गड किल्ले आज देखील जशेच्या तशे आहेत.