स्वराज्याचा जिने घडविला विधाता,
धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता ॥
राजमाता जिजाबाई यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळील देऊळगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराजे जाधव आणि आईचे नाव म्हाळसा बाई होते. त्यांचे वडील लखुजीराजे जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. तसेच सिंदखेडराजा येथील मातब्बर सरदार होते. जिजाबाईंना लहानपणापासुनच विविध विद्याबरोबर राजकारणाचे व युद्धनीतीचे बाळकडू मिळाले होते. त्यांच्या लहान वयातच त्यांचा विवाह डिसेंबर १६०५ मध्ये वेरूळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले यांचे चिरंजीव शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.
१९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाबाई यांच्या पोटी तेजस्वी, पराक्रमी अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जिजाबाईंनी लहानपणापासूनच शिवरायांवर रामायण व महाभारतातील राम, कृष्ण, अर्जुन, भीम या वीरांच्या गोष्टी सांगून संस्कार केले. नेहमी सत्याचा विजय होतो तसेच अन्याय करणे व अन्यास सहन करणे दोन्हीही कसे चुकीचे आहे हे पटवून देत. शिवरायांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत त्या सदैव जागरूक होत्या. त्यांनी शिवरायांवर शील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्यस्वप्न इत्यादींचे चे संस्कार केले.
त्यांनी स्वराज्य स्थापना करण्याच्या कार्यात शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. हिंदवी स्वराज्याच्या कार्या त शिवरायांना अनेक धाडसी मोहिमा कराव्या लागल्या. जीव धोक्यात घालावा लागला. परंतु त्यांनी आपल्या काळजावर दगड ठेऊन स्वराज्यासाठी शिवरायांना धोका पत्कारण्यापासून रोखले नाही. त्यांच्या त्यागाच्या जीवावरच हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकलं. १७ जून १६७४ रोजी किल्ले राजगडजवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले.
हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, पराक्रम व संघटन अशा सत्वगुणांचे बाळकडू देणा-या राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा.